वर्गमित्रांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; आषाढी दिंडीचे स्वागत, वारकऱ्यांना भोजन व वस्त्रदान
देऊळगाव राजा …..प्रतीनीधी
आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त देऊळगाव राजा हायस्कूलच्या सन १९८२-८३ च्या वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करून तसेच वस्त्रदानाचा उपक्रम राबवत त्यांनी सेवाभावाचा आदर्श घालून दिला.
मराठवाड्यातील वडखेड येथून पंढरपूरकडे निघालेल्या जय बजरंग पायी दिंडीचा मुक्काम देऊळगाव राजा येथे होता. या वेळी वर्गमित्रांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी वारकऱ्यांचे आदरातिथ्य करत प्रेमपूर्वक भोजन दिले. याशिवाय अनेक वारकऱ्यांना नवीन कपडे व आवश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
“वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजाला एकत्र आणणारी संस्कृती आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वर्गमित्रांनी स्वतःच्या योगदानातून हा सेवाकार्याचा उपक्रम यशस्वी केला. वारकऱ्यांनीही या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयोजकांना आशीर्वाद दिले.
या उपक्रमात वर्गमित्रांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी भोजन व वस्त्रवाटपाच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. सेवाभाव, मैत्री आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
आषाढी वारीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा सामाजिक उपक्रमांतून समाजात सेवाभाव आणि एकात्मतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





